Poetess Bahinabai Chaudhari
Contact Information:
Nisargkanya Kaviyatri Bahinabai Chaudhari Vikas Manch, Asoda
Tal. Dist. Jalgaon, MS - 425101
Contacts:
Kishore Chaudhari
Pradeep Bhole
Umesh Wani
Sanjay Mahajan
बहिणाबाई चौधरी पुण्यस्मरण
२४ ऑगस्ट, इ.स. १८८० - ३ डिसेंबर, इ.स. १९५१ या अहिराणी-मराठी कवयित्री होत्या...
बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म : २४ ऑगस्ट इ.स. १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाई व वडीलांचे नाव (...?) होते. तीन भाऊ- घमा,गना आणि घना तीन बहिणी- अहिल्या,सीता आणि तुळसा. (इ.स.१८९३?) मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी (इ.स.१९१० ?) बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या बहात्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणार्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणार्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.
अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !
अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं
अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !
अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड
अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे
ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन् दुःखाले होकार
देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !
अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार
असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे
इचू साप बरा, त्याले उतारे मंतर
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं